ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे. आज, आपल्या नजिकच्या भूतकाळाबद्दल नाहक शंका उपस्थित केल्या जात असताना, गेल्या पन्नास-साठ-सत्तर वर्षांत आपण काय केले असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, येता-जाता इस्रायलच्या ‘मोसाद’चे उदाहरण देत आपल्या देशाच्या तथाकथित दौर्बल्याचा प्रचार केला जात असताना, रॉचा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.